डाटा इज न्यू ऑइल आणि सॉईल
1 April 2019
/ By Vinayak Pachalag.
गेल्या महिन्याभरात सगळ्यात जास्त चर्चा जगात कशाची सुरु असेल तर ती फेसबुक डाटा लीक प्रकरणाची. हे प्रकरण तसे जुने, डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली त्यावेळचे. त्यावेळी केंब्रिज अॅनॅलिटिका या कंपनीमधल्या काही शास्त्रज्ञांनी फेसबुक वरच्या काही युजर्स चा खाजगी डाटा ( म्हणजे त्या माध्यमांवर असणारी त्यांची वैयक्तिक माहिती) मिळवला, त्याचा अभ्यास करुन प्रत्येक व्यक्तीची मनोवैज्ञानिक जडण घडण ओळखली व त्यानुसार ट्रंप यांचे ऑनलाईन प्रचार धोरण आखले. थोड्क्यात काय , तर काहीशा गैरमार्गाने मिळवलेल्या माहितीमुळे व त्याच्या अफाट पृथ्थकरण क्षमतेमुळे अमेरिकेसारख्या देशातील राष्ट्राध्यक्ष निवडीवर प्रभाव पाडता आला. खरेतर असे काही झाले याची माहिती निदान तंत्रज्ञान व राजकीय क्षेत्रातील सगळ्यांनाच फार आधी पासुन होती. फेसबुक ने परवा ते अधिकृत रित्या मान्य केले इतकेच. मग आता गेल्या तीन आठवड्यात फेसबुक ला एकुण बसलेला १०० बिलियन डॉलर चा फटका, फेसबुक चा जाहिर माफीनामा आणि अगदी गेल्या आठवड्यात अमेरिकी सिनेट समोर झालेली झुकरबर्ग ची उलट तपासणी आदी अनुशंगिक बाबी घडुन आल्या. पण झाले असे की,यानिमिताने कित्येकांना अचानकच असे "प्रायव्हसी" नावाचे काही असते याची अचानक जाणीव झाली व जणू जॉर्ज ओरव्हेल च्या "१९८४" या कादंबरीमध्ये वर्णिल्या प्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे , सगळी कशी बोंबाबोंबच आहे, आता जगाचे कसे होणार वगैरे वगैरे वाटायला लागले , तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना अजून या सगळ्याचा अदमास च आलेला नाही की ऑनलाईन डाटा चोरणे म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम खरेच एवढे खोल आहेत का इ. पण या सगळ्या गदारोळामुळे आपण नक्की कोणते तंत्रज्ञान वापरायचे आणि काय करायचे याचा प्रचंड गोंधळ त्यांच्या मनात तयार झालेला आहे. खरे सांगायचे तर परिस्थिती या दोन्हीच्या मध्ये आहे. डिजिटल अभ्यासकांच्या वर्तुळात आजकाल गाजणारी "डाटा इज न्यू ऑइल" ही जी म्हण आहे. ती म्हण आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडते किंबुहना ही म्हण हे जे काही प्रकरण घडले आहे त्याचा परिणाम समजुन घेण्यास पुरेशी आहे .
या म्हणीत डाटा व ऑइल असे दोन शब्द आहेत. हे दोन्ही शब्द आधी आपण नीट समजून घेऊयात. यातला डाटा म्हणजे काय तर आपली सर्व माहिती. कोणती माहिती ? तर आपल्याबद्दलची जी माहिती तंत्रज्ञानामुळे मिळवता येते , साठवता येते व त्याच्यावर प्रक्रिया करता येते अशी माहिती. उदा. आपल्यातले बहुतांश लोक हातात जो ५-६ इंची स्मार्टफोन वापरतात त्याला "अँड्रॉइड" फोन असे म्हणतात. म्हणजे काय तर या फोन मध्ये जी प्रणाली आहे , जी हा सर्व फोन चालवते तीचे नाव 'अँड्रॉइड" असे आहे.या मुख्य प्रणालीला अनुसरुन मग आपण बाकीचे अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करुन वापरतो. उदा. व्हॉट्सॅप. आता या "अँड्रॉइड" कंपनीचा मूळ मालक आहे " गुगल". हे स्मार्ट फोन वापरण्यासाठी आपले जीमेल वर अकाऊंट असायला लागते. ते जीमेल ही गुगल चेच. आणि या सर्वांवर कडी म्हणजे "गुगल सर्च". नेटवर काही शोधायचे असेल तर आपण जो सर्च करतो तो गुगल वरुनच. जणु काही शोधणे या शब्दाला गुगल हा प्रतिशब्द झाला आहे. या गुगल शिवाय तर इंटरनेट वर जणू काहीच करता येत नाही. ( बिंग, याहु, इन अशा बाकीच्या सर्च इंजिन ची नावे तरी पटकन आठवतात का आजकाल? ) थोडक्यात काय तर, आपण डिजिटल जगात जे काही करतो ते १०० % या गुगलच्या माध्यमातून करतो. आणि आपण जे काही करत असतो, म्हणजे अगदी मोबाईल वापरून कोल्हापूर- पुणे तिकीट काढण्यापासुन ते एखाद्या विकेंड ला रात्री कोणत्या हॉटेल ला जेवायला जायचे ते निवडण्यापर्यंत, या सर्व गोष्टी आपण स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरुन करत असतो आणि आपल्या या सर्व गोष्टींची नोंद गुगल त्याच्याकडे ठेवत जाते. हा झाला सगळा आपला "डाटा". आणि आपल्या नक्की कोणकोणत्या गोष्टींची गुगल नोंद करून ठेवते ते आपल्याला बघायची सोय आहे बर का. याच लेखात चौकटीत दिलेल्या स्टेप्स वापरुन एकदा का तुम्ही तुमचा हा डाटा डाउनलोड केलात की आपल्याबद्दलची किती अवाढव्य माहिती जनरेट केली गेली आहे व साठवली गेली आहे ते तुमच्या पटकन लक्षात येईल. जी गोष्ट गुगल ची ,तीच गोष्ट फेसबुक ची. आपण फेसबुक वर जे काही लिहितो, चेक इन करतो, कोणाकोणाला लाईक करतो , कोणकोणावर कॉमेंट करतो, कोणकोणते फोटो टाकतो या सगळ्याची नोद फेसबुक तयार करते.आपण गेली साधारणतः १५ वर्षे गुगल आणि १० वर्षे फेसबुक वापरत आहोत. या कालावधीतील या माध्यमांवरील आपल्या प्रत्येक हालचालीची नोंद त्यांच्याकडे आहे. बर , गुगल आणि फेसबुक या झाल्या दोन प्रमुख कंपन्या. पण अशा इतरही कंपन्या ज्यांची सेवा आपण अगदी काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण वापरतो, ती प्रत्येक कंपनी, मग ती ऑनलाईन खरेदीसाठी आपण ज्या साईट्स वापरतो त्या ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट असोत वा ज्यांचे मोबाईल हँडसेट आपण वापरतो त्या अँपल,सॅमसंग किंवा एम आय असोत. या सर्वच कंपन्या आपली माहिती सतत साठवत राहतात. या सगळ्यातून जी तयार होते ती म्हणजे आपली प्रत्येकाची "डिजिटल फुटप्रिंट" .
जगातल्या प्रत्येक माणसाची एवढी अवाढव्य अशी माहिती आता साठवुन ठेवणे नवीन तंत्रज्ञानामुळे सहज शक्य आहे. इतकेच नव्हे तर आता या डाटावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग करायची सोय आणि क्षमतासुद्धा सहज उपलब्ध आहे. ती वापरुन या रॉ डाटा मधून बरेचसे निष्कर्ष काढता येतात. जसे की, या या "अबक" व्यक्तिची खायची प्यायची आवड निवड काय आहे, तो नेहमी कोणकोणत्या ठिकाणांना भेट देतो, त्याला कोणते विचार आवडतात, त्याचे लग्न झाले आहे की तो एकटा आहे वगैरे वगैरे. हे सर्व निष्कर्ष आपल्या बाबत सतत काढले जात असतात व या निष्कर्षांचा वापर हा आपल्याला जास्तीत जास्त योग्य, व आपण लगेच प्रभावित होऊ अशा जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. आपला प्रत्येक निर्णय, जसे की आज साबण कोणता विकत घ्यावा इथेपासून ते अगदी मी कोणाला मतदान करावे इथेपर्यंतच्या सर्व वैयक्तिक निर्णयांवर प्रभाव पाडायचा प्रयत्न केला जातो. आता तुम्ही असे विचाराल की हे असे का केले जाते? याचे कारण असे आहे की या सर्व कंपनांच्या प्रमुख व्यवसाय हा जाहिरात व इन्फल्युऐंनसिग हा आहे. या सर्व जाहिरातींच्या कंपन्या आहेत व जितकी उत्तम जाहिरात ते दाखवतील व जितके जास्त लोक त्या जाहिरातींना भुलुन निर्णय घेतील तितका त्यांचा फायदा जास्त !!! एव्हाना आपल्या सर्वांना याची जाणिव झाली असेल की या जगात फुकट असे काही नसते. पण आपणतर फेसबुक , व्हॉट्सएप साठी एक पैसा ही देत नाही ,गुगल साठीही नाही. तरीही इतके उत्तम तंत्रज्ञान आपल्याला फुकट का मिळते , मग हे बनवायला आणि सांभाळायला जो अफाट खर्च येतो , तो कोठुन निघतो ,याचा आपण कधीतरी विचार केला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की आपण त्यांचे गिर्हाईकच नाही आहोत, आपण गिर्हाईक असतो ,तर त्यांनी आपल्याकडुन पैसे घेतले असते. उलट आपण त्यांचे खरे उत्पादन आहोत, आपल्या माहितीच्या स्वरुपात आपली विक्री करुन त्यावर ते पैसे कमावतात आणि जाहिरातदार व इन्फल्युन्सर हे त्यांचे खरे गिर्हाईक आहेत, जे त्यांना आपल्या माहितीचे बक्कळ पैसे देतात . उदाहरण द्यायचे झाले,तर आपली सर्च हिस्टरी जाणून घेऊन वा आपले चॅट पडताळुन फेसबुक व गुगल ला जाणवते की आपल्याला नवीन कपडे घ्यायचे आहेत, ते लगेच आपल्या आवडीच्या कपड्यांची जाहिरात सुरु करतात, ती पाहुन आपण पाघळतो व फ्लिपकार्ट वरुन शर्ट खरेदी करतो, त्याचवेळी आपल्याच पैशातले काही पैसे फेसबुक व गुगल ला फ्लिपकार्ट देते थोडक्यात काय तर आपल्याला मिळणार्या प्रत्येक सुविधेची किंमत ही आपण पैशाच्या रुपात नव्हे तर आपल्या माहितीच्या रुपात ( खाजगी व सार्वजनिक दोन्ही) मोजलेली आहे. माहिती हे नव्या जगाचे सर्वात मोठे चलनी नाणे आहे !!!!
आता या सर्व नव्या रिऍलिटी चा ऑइल म्हणजे तेलाशी काय संबध ? तर , आज जग बदलायची आणि जगाला दिशा द्यायची जी ताकद २१ व्या शतकात "डाटा" कडे आहे तीच ताकद गेल्या शतकात खनिज तेलाकडे होती. म्हणजे, मध्यपुर्वेत जी काही युद्धे झाली किंवा अमेरिका व रशिया सारखे देश कारण नसताना ज्या विविध युध्दात उतरले. त्याला प्रमुख कारण खनिज तेलावर मालकी कोणाची ? हे होते.अगदी अलिकडच्या सद्दाम हुसेन प्रकरणापर्यंत हेच सुरु होते. पॅसिफिक स्टँडर्ड ने एका मोठ्या रिसर्च पेपर द्वारे हे संबंध सप्रमाण सिद्ध केले आहेत. ज्याचा निष्कर्ष एकच होता की ज्याच्याकडे जास्त खनिज तेल तो जगावर राज्य करत होता. तो खरा महासत्ता होता. आणि जगातल्या सर्व माणसांचे आयुष्य अप्रत्यक्ष पणे तेलावर अवलंबून होते. आज हेच सर्व "डाटा" बद्दल घडत आहे. म्हणजे काय ,तर आजच्या सर्व लढाया या "डाटा "साठी आणि डाटा वापरून खेळल्या जातात. अमेरिका निवडणुकीत डाटा वापरूनच रशिया प्रभाव पाडू शकली ना ! आजच्या जगाच्या नव्या महासत्ता हा कोणता देश नसून त्या गुगल आणि फेसबुक आहेत. गेल्या आठवड्यात झुकरबर्ग ला सिनेट मध्ये बोलावुन जे काय उलट तपासणीचे नाटक रचले गेले त्यामागची मुळ प्रेरणा फेसबुक महासत्ता नाही , तर अमेरिकन सरकारच आहे , हे समाजावर बिंबवायचीच होती. ज्या प्ध्दतीचे या तपासणीचे फोटो नेटवर प्रकाशित झाले त्यावरुन या मुद्द्याला पुष्टीच मिळते. बलाढ्य कोण, अमेरिका देश का अमेरीकेतील कंपनी ? असा हा मुद्दा !! यानिमिताने हे लक्षात घेऊया आपण की २१ व्या शतकातल्या जगातील सर्वाधिक प्रभावी ५ कंपन्या या गुगल, फेसबुक, ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अँपल या आहेत आणि पाचही कंपन्यांचे मूळ हे डाटा मध्ये आहे. शिवाय डाटा आणि ऑईल मध्ये आणखी एक साम्य आहे. ज्याप्रमाणे फक्त खनिज तेलाचा काही उपयोग नाही ,पण त्यावर प्रोसेसिंग करून अगदी ग्रीस पासुन ते विमानातल्या इंधनापर्यंत हजारो उत्पादने निघू शकतात, त्या पद्धतीने नुसत्या डाटा चा उपयोग नाही.पण त्यावर प्रोसेसिंग म्हणजे डाटा अॅनॅलिटिक्स किंवा व्हिज्युअलाय्जेशन चा वापर केला तर डाटा मधुनही वेगवेगळी शेकडो उत्पादने निघतात. पण या दोघांचाही प्रोसेसिंग केल्याशिबाय उपयोग करता येत नाही !! या सर्व साम्यस्थळामुळेच असे म्हणता येते की डाटा इज न्यू ऑइल.
आता तुमच्यातले काही जण म्हणतील की हे सगळं कळलय आम्हाला गेल्या काही दिबसात. याच्या पुढे काय ? ते सांग. तर पुढच्या प्रवासातला पहिला मुद्दा हाच आहे की ही नवी रिऍलिटी आहे हे आपण आधी मनापासून मान्य करूया आणि ती आपल्याला बदलता येणार नाही आहे हे ही मान्य करूया. झाले आहे असे की ,हे डाटा लीक प्रकरण आणि त्याचे गांभिर्य समजल्या पासून एक नवं फॅड आलाय की आपला डाटा वापरणारे किंवा भविष्यात जिथुन आपली माहिती लीक व्हायची शक्यता आहे, ते काही वापरुच नका!! फेसबुक बंद करा, "आधार" ला विरोध करा वगैरे वगैरे. काही महान लोक तर "डीलीट फेसबुक" नावाची कॅम्पेन फेसबुक वरच प्रसारित करत आहेत. तर मुद्दा असा आहे की भविष्यात आपल्या माहितीचा गैरवापर व्हायची शकयता आहे किंवा आत्ता काही प्रमाणात वापर होतोय म्हणुन ते साधनच वापरायचे बंद करा असा विचार केला तर नक्की काय काय वापरायचे बंद करणार आपण ? तसे जर ठरवले तर अश्मयुगात जाऊन राहावे लागेल आपल्याला परत. कारण, आजकालचे रोजचे जगणेच डिजिटल झाले आहे की प्रत्येक ठिकाणी डाटा तयार होतो आणि प्रत्येक ठिकाणी त्यावर लक्ष ठेऊन गैरवापर करता येतो. त्यामुळे अशा काही अवास्तव आणि आतार्किक मांडण्या करत कुढत बसण्यापेक्षा नव्या जगात आपली वैयक्तिक माहिती ही वैयक्तिक नाही आणि तिचा कोठेही वापर होऊ शकतो हे वास्तव मान्य करून पुढे जाऊया ना ! त्याने , जास्त प्रॅक्टिकल होऊन या नव्या प्रश्नाला भिडता येईल.
मग उपाय समोर येतो तो " कॉन्शिअस डाटा शेअरींग " चा. म्हणजे काय तर सजगपणे आपला "डाटा" या कंपन्यांना वापरायला देणे. सध्याच्या जगातला खरा त्रागा हा आपली माहिती वापरली जात आहे याचा नसून ती का वापरली जात आहे आणि कोण वापरत आहे ? हे आपल्याला माहीत नसणे हा आहे. अगदी डाटा लिक च्या फेसबुकच्या प्रकरणात चुक खरी हीच आहे की माहिती घेतली गेली एका क्विझ साठी म्हणुन आणि वापरली गेली ट्रंप साठी इतकेच. हेच जर का, ट्रंप यांची नीट प्रसिद्धी व्हावी यासाठी आम्ही ही माहिती विकत घेत आहोत असे सांगुन सवरुन मग फेसबुक कडून ती घेतली गेली असती.
तर हा विषय एवढा मोठा झालाच नसता कदाचित. म्हणून कॉन्शिअस डाटा शेअरींग म्हणजे ,माझी माहितीच वापरू न देण्याऐवजी. ती वापरा. पण का आणि कशासाठी वापरत आहात याची संपूर्ण जाणीव मला असू द्या. एकदा मला कळले की ही माहिती मला जाहिराती दाखवण्यासाठी किंवा माझे राजकीय मत वळवण्यासाठी वापरले जाणार आहे , तर मग मी सजग राहीन आणि सजग मनाने निर्णय घेईन. एकदा माझ्या मनात हे फिट बसले की मला नेटवर दिसणारे जे काही आहे ते मला आवडावे याचप्रकारे दाखवले जात आहे, तर कदाचित याही पेक्षा वेगळी बाजू असेल हा एखाद्या गोष्टीची ,हे मनात तरी येईल माझ्या. मुद्दा आपल्या मेंदूला ट्रेन करण्याचा आहे. आणि त्यातून समजा एखाद्या गोष्टीचे प्रभाव तरीही आपल्यावर पडला तर मग त्याचे मार्केटिंग स्किल्स उत्तम आहेत ! जे योग्यच आहे ना . आजही आपण खर्या जगात ही , ज्याचे उत्तम मार्केटिंग आहे. त्याचेच आपण ऐकतो ना .तसेच इथे होईल इतकेच.याला अजून एक सोपे उदाहरण द्यायचे झाले तर आजकाल जिथे जिथे सी सी टीव्ही लावलेला असतो, तिथे तिथे हा परिसर कॅमेराच्या अख्यतारीत आहे असे लिहिलेले असते. ते वाचल्या वाचल्या नकळत आपले मन सजग होते आणि आपली वर्तणुक बदलते. असेच काहीसे "डाटा" च्या बाबत व्हायला हवे. खरेतर यात या कंपन्यापेक्षा आपलीच चूक अधिक आहे. कारण या कंपन्यांनी आम्ही तुमचा डाटा वापरणार आहोत हे आपल्याला अधिच सांगितलेले असते. पण, ते असते बारीक अक्षरात आणि आय ऍग्री नावाच्या बटनावर क्लिक करताना आपण सुद्धा एकही टर्म आणि कंडीशन न वाचताच ते बटन दाबतो.. त्यामुळे आपण आपला डाटा वापरायला परवानगी देऊन बसतो. त्पण नक्की कशाकशाची परवानगी देत आहोत ते पाहण्याची सजगता आणणे आणि आपली कोणकोणती माहिती ,का वापरली जात आहे हे आपल्याला ठळक पणे , सहज समजेल असे कळावे यासाठी या कंपन्यांवर दबाव आणणे या दोन गोष्टी ठरवाव्या लागतील.
जॉन हॅवन्स नावाचा एक अमेरिकन डाटा सायंटीस्ट आहे. त्याचे " हॅकिंग हॅपिनेस: व्हाय पर्सनल डाटा काउंट्स " नावाचे पुस्तक याबाबत मुळापासून वाचण्यासारखे आहे. त्यात तो एक भन्नाट मुद्दा मांडतो तो असा की , आपली माहिती वापरून या कंपन्या गब्बर फायदा मिळवतात, पण आपल्याला हातात काय लागते ,तर शून्य ! कारण का, तर आपल्या माहितीच्या जीवावर हे लोक पैसे मिळवत आहेत , हे आपल्याला जाणवतच नाही. आणि जाणवले तरी ते आपण मान्य करायचे धाडस करत नाही. हा असा डाटाचा वापर थांबवला पाहिजे असे आपण बोलत राहतो आणि रोज नवीन नवीन अॅप, त्यांना आपल्या मोबाईल चे सर्व अॅक्सेस देऊन डाऊनलोड करत मात्र राहतो . जॉन असे म्हणतो की असा दुट्ट्पीपणा करायच्या ऐवजी असे करूया, की बिनधास्त आपली माहिती आपण स्वखुषीने थेट या कंपन्यांना देऊया आणि ते जर का या माहितीच्या जिवावर १० रुपये मिळवत आसतील तर त्यातला १ रुपया आपल्याला आपला हिस्सा म्हणुन मागूया. म्हणजे आपल्या माहितीची योग्य किंमत ही आपल्याला मिळत राहील आणि सर्वानाच माहिती उपलब्ध झाल्याने आता जी माहितीवर काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी आहे असे वाटते तेही नाहिसे होऊन जाईल. आता भारतीय परिप्रेक्ष्यात जरी असे घडणे आपल्याला जरी फार पुढचे वाटत असले किंवा अतिशयोक्त वाटत असेल तरी याच दिशेनं आपल्याला जावे लागेल . कारण तसे केले तरच या नव्या जगाची विश्वासार्हता टिकून राहील. कारण , तंत्रज्ञानातील बदलानंतर खरतर ही जी नवी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे ती सगळी " ट्रस्ट इकॉनॉमी" आहे. मुद्दा माहिती चोरिचा नाहीच आहे खरतर . मुद्दा हा कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा आहे. ओला तुन येणार्या अनोळखी टॅक्सी ड्रायव्हरवर आपण विश्वास टाकतो, एअर बी एन बी नावाचे अॅप वापरताना अॅप वरुन मिळणार्या अनोळखी घरी आपण विश्वासाने राहायला जातो. फेसबुक वरच्या मित्र- मैत्रींणींशी लग्न हे करतात काही लोक. जेव्हा डाटा लिक होतो तेव्हा माहिती चोरीला जाण्याचे काही वाटत नाही, आपण काही कोणी राष्ट्राध्यक्ष वा रॉ एजंट नाही की आपल्या माहितीने फार काही फरक पडेल. खरा राग येतो तो विश्वास घात झाल्याचा !!! ज्याच्यावर आपण विश्वास टाकला त्यानेच फसवल्याचा राग.
आता या नजरेने गेल्या काही महिन्यातल्या घटनाक्रमावर थोडी पुन्हा दृष्टी वळवुया,खरेतर फेसबुक आपली माहिती वापरते, हे गेल्या कित्येक वर्षांपासून चे उघड गुपित आहे. त्यासाठीच त्यांनी व्हॉट्सएप मधून शून्य रुपये मिळत असताना १९ बिलियन डॉलर मोजले. त्या व्हॉट्सेप मधुन मिळणारा अगणित माहिती संच मिळावा म्हणून. मग मार्क झुकरबर्ग ने आत्ताच माफीनामा का सादर केला ? हा माफीनामा सादर करण्याआधी १ महिना त्यांनी फेक न्यूज वाढू नयेत म्हणून स्वतः चा प्रोग्रॅम बदलला. या दोन्ही मुळे फेसबुक ला आधी मांडल्याप्रमाणे १०० बिलियन डॉलर चे नुकसान झाले. आता आपल्या या योजनेमुळे इतके नुकसान होणार आहे , याची पूर्व कल्पना फेसबुक ला नक्कीच असणार ,तरीही त्यांनी हा निर्णय घेतला . कारण, जर का लॉंग टर्म एखादा युजर त्यांच्यासोबत राहायचा असेल तर त्याचा विश्वास हिच खरी संपत्ती आहे याची जाणिव या सगळ्या लोकांना झालेली आहे. गुगल ने सुद्दा गेले काही दिवस अँड्रॉइड फोनवर कोणते अँप वापरताना आपला काय काय डाटा वापरला जातो यांच्या परमिशन्स अगदी ठळक पणे मागायला सुरवात केली आहे. हे सगळे या ट्रस्ट इकॉनॉमी चे निर्देशक आहेत. फेसबुक चा झुकरबर्ग असो वा गुगलचा लॅरी पेज, हे सगळी चाळीशीच्या आतले तरुण आहेत. एवढ्या कमी वयात त्यांच्याकडे महासत्तेच्या चाव्यातर आल्या, पण त्यासोबत येणारी जबाबदारी त्यांना आता जाणवत आहे, आणि त्याप्रमाणे ते बदलत आहेत, जे स्वागतार्ह आहे. पण , याबाबतीत सुदधा पुन्हा आपण भारतीयांची भूमिका थोडीशी विचित्र म्हणावी अशी आहे. जो डाटा भारत सरकार गोळा करत आहे, जो भारतीय कायद्याच्या आधीन आहे असा आधार चा डाटा द्यायला आपण विरोध करत आहोत, जणू दुसरी आणीबानी आणल्यासारख्या गप्पा मारत आहोत पण त्याच वेळी आपल्या अॅपल च्या आय फोन वरून आणि चायनीज स्मार्ट फोन वरून आपले अगदी हातांचे आणि डोळ्यांचे ठसे या कंपन्यांना देत आहोत. यातल्या कोणत्याही कंपनीचा डाटा हा भारतीय कायद्याच्या अख्यातारीत सुद्धा येत नाही. मग नक्की आपला कोणावर विश्वास आहे ? ज्यात कायद्याने रक्षण आहे अशा सरकारी व्यवस्थेवर का कोणत्या अनोळखी कंपनीवर ? बाकीच्या देशात फेसबुक, गुगल ने सर्व्हर त्या त्या देशात ठेवावेत यासाठी लढे सुरु आहेत आणि आपल्याकडे आपण नॅशनल सोशल मीडिया हवा या विषयावर आंदोलन करायच्या ऐवजी " आधार" वर राजकीय भांडणे खेळत बसलो आहोत. एकटे आनंद महिंद्रा तेवढे या विषयावर मुलभुत काही करण्यात गुंतले आहेत. बाकीच्यांचे काय? एक समाज म्हणुन आपली प्रायोरीटी चुकल्याचे याहून मोठे द्योतक काय हवे ?
या सर्व प्रकारातून असे लक्षात येते की माहिती अर्थात डाटा हा जसा ऑइल आहे तसा तो सॉईल पण आहे . मातीत जे पेराल ते उगवते , तसेच या महितीचे आहे. माहितीच्या पायावर जे पाहीजेल ते उभा करता येते. त्यासाठी हवा तो चांगला माळी अर्थात क्युरेटर . माहिती नीट क्युरेट केली तर त्यातून असाध्य आजारांवर उपचार निघतात आणि चुकीच्या पद्धतीने वापरला तर त्त्यातुन केम्ब्रिज अॅनालिटीका पण तयार होते. शेवटी ते एक टूल आहे आणि सुदैवाने ते प्रत्येकाला उपलब्ध आहे. म्हणजे, आपल्या देशात असा एकही राजकीय पक्ष नाही की ज्यानी डाटा अनलिटिक्स च्या सुविधा घेतल्या नव्हत्या. सो आता हे डाटाचे हत्यार सर्वांना उपलब्ध आहे , कोण्या एकाची ती मक्तेदारी नाही. मग पुढचा प्रश्न असा येतो की आपल्याकडच्या माहितीची ताकद आपण ओळ्खली आहे का ? जसे फेसबुक व गुगल अनलिटिक्स वापरून जगावर राज्य करत आहेत, तर तीच टूल आपण आपल्या डाटा साठी का वापरत नाही ? डाटा हा फक्त फेसबुक वा गुगल च तयार करते असे नाही.आपल्या सर्वांकडे खुप सारी माहिती ही पुर्वीपासुन होती व आहे, बदल इतकाच झाला आहे की आता त्याचे पृत्थकरण करायची वेगवेगळी साधने मिळाली आहेत. उदा. हेच डाटा अॅनॅलिटिक्स वापरुन कॅन्सर खुप आधी डीटेक्ट करायचे तंत्रज्ञान काढले आहे, शेतकर्यांकडची वर्षानुवर्षाची माहिती गोळा करुन त्यानुसार सस्टेनेबल फार्मिंग चे मॉडेल याच डाटा तुन निघाले आहे. अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे या डाटा च्या पॉझिटिव्ह वापराची देता येतील. पण , आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टींना पटकन प्रसिद्दी मिळत असल्याने " डाटा" मुळे झालेले चांगले चमत्कार अजुन लोकांना माहितच नाहीत. पण, आता ती वेळ आली आहे की प्रत्येकाने ही ताकद समजुन घेऊन तीचा भल्यासाठी वापर करायची. तो नाही केला तर आपण एक मोठी संधी वाया घालवु
आजही सरकारचे कितीतरी विभाग असोत ,वा अगदी साप्ताहिक साधना सारख्या हजारो सामाजिक संस्था. या सर्वांचा इतिहास एवढा मोठा आहे की तो सगळा डाटा जर का आंतरजालावर आणला आणि त्यावर नीट प्रोसेसिंग केले तर ही माहिती या संस्थासाठी सोन्यासारखी मोलाची ठरेल. एकुणात आता सगळ्यांचा लक्षात आले आहे की माहितीची " मालकी आणि मांडणी" यावर उद्याचे भविष्य अवलंबून असणार आहे. अशावेळी आपल्या मालकीचा डाटा अधिक सिक्युअर बनवणे व सहज उपलब्ध असणारी यंत्रणा वावरून तो सुटसुटीत पणे लोकांपुढे मांडणे यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. यासंदर्भात परवा पुण्यात झालेला एक प्रयोग नोंद घेण्याजोगा आहे. एखादया महापालिकेचे बजेट म्हणजे सरकारी विषय, सामन्यांना त्यात काय कळणार ? पण पुण्याच्या ५ वर्षाच्या बजेट चे प्रुत्थकरण साहिल देव व त्यांच्या डाटा टीम ने केले व अत्यंत सुंदर प्रकारे माहितीची मांडणी करून ती लोकांपुढे मांडली. जी बघून एका क्लिकवर सामान्य नागरिकांना ही बजेट समजू लागले. फेसबुक चा वाईट वापर आणि असा चांगला वापर, दोन्हीच्या मागचे तंत्रज्ञान एकच पण फक्त मातीला पाणी घालणारा क्युरेटर वेगळा इतकाच मुद्दा. अशावेळी प्रत्येक संस्थेने एखादा चांगला डाटा क्युरेटर नेमणे, आपली वेबसाईट अद्ययावत बनवणे , आपल्याकडे असणारी सर्व माहिती त्याची नीट मांडणी करुन कॉपीराईट करुन आंतरजालावर सर्वांना सहज उपलब्ध होईल असे पाहिणे,इंटरनेटवर असणारे " डाटा व्हिज्युअलायजेशन" चे ४-६ आठवड्यांचे कोर्स संस्थेत कोणाला तरी करायला लावुन आपल्याकडील माहितीची सुटसुटीत मांडणी करणे व ती स्वतः हुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असे पाहणे अशा बर्याच गोष्टी करता येतील.
यानिमित्ताने अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आज प्रत्येकाकडे दिवसाला १ जीबी इतके इंटरनेट उपलब्ध आहे . त्या इंटरनेट ने तरुणाई ची मती गुंग झालेली आहे . कंपन्यांना माहिती चोरण्यासाठी तेही एक प्रमुख कारण आहे की रोज जर का तुमच्याकडे वेळ व इंटरनेट आहे तर तुम्ही नकळत या माहिती चोरण्याच्या ट्रॅप मध्ये अडकणारच. आता सध्या एक प्रकार सुरू आहे फेसबुक वर, की तुम्ही कोणते राजकारणी व्हाल, २० वर्षाने कसे दिसाल वगैरे माहिती मिळवा, लोक रिकामे असल्याने अशा अँप्स चा वापर क्षणिक आनंदासाठी करत बसतात, या टाइम पास अँप चा एकच उद्देश असतो ती म्हणजे तुमची माहिती चोरणे . पण इथे या तरुणाई ला का दोषी धरायचे ? त्यांना तो १ जीबी इंटरनेट संपवायला आपण काही चांगले पर्याय दिले आहेत का ? महाराष्ट्रात एवढ्या व्याख्यानमाला आहेत, त्यातले किती जण ती व्याख्याने ऑनलाईन अपलोड करतात ? किती चांगले रिसर्च पेपर येतात ? महत्वाच्या विषयांवर चांगले इन्फोग्राफिक्स किती येतात ? हे सगळे सुद्दा डाटा चेच प्रकार आहेत. हे काही तरुणाईला मिळत नाही म्हणुन अपरिहार्यता म्हणुन त्यांना नको त्या डिजिटल ठिकाणी वेळ घालावावा लागतो. लोक फालतू डाटावर अब्जावधी कमावतात , हे एव्हाना लक्षात आले असेलच. मग आपण आपला चांगला, महत्त्वाचा डाटा न वापरायचा कर्मदारिद्री पणा का करायचा ?
या फेसबुक प्रकरणामुळे एक चांगले झाले की प्रत्येकाला " डाटा " ची किंमत कळली . आता तरी निदान या नव्या ऑइल कडे वेगळ्या नजरेने पाहून त्यातून उद्याचे उज्जवल भविष्य पेरायसाठी प्रयत्न करूया. तसे झाले तर झुकरबर्ग चे पाण्यात गेलेले १०० बिलियन आणि आपला चोरीला गेलेला डाटा सार्थकी लागेल .
चौकट :
-
१. आपला फेसबुक डाटा नक्की काय काय आहे हे पाहण्यासाठी फेसबुक च्या अकाउंट सेटिंग मध्ये जाऊन डाउनलोड कॉपी ऑफ युर डाटा वर क्लिक करा. डाउनलोड झालेला डाटा पाहिल्यावर तुंही स्तिमित व्हाल
-
२. गुगल आपला कायकाय डाटा घेते हे पाहण्यासाठी www.google.com/takeout या लिंकवरून आपला सर्व डाटा आणि मॅप्स डाउनलोड करू शकता